आजपर्यंत राजाराम कारखाना आम्ही एखाद्या मंदिरासारखा जपला, तो लुटारूंच्या ताब्यात जाऊ देऊ नका – अमल महाडिक

कोल्हापूर, दि.7 एप्रिल 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राजाराम कारखाना म्हणजे सभासद शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या घामावर उभारलेले श्रमाचे मंदिर आहे. पण काही स्वार्थी लोक सभासदांनी उभारलेले आणि जपलेले हे मंदिर बळकावू पाहत आहेत. त्यांचा हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही असा निर्धार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.छत्रपती राजाराम कारखान्याच्या प्रचाराला आता जोर आला आहे थेट प्रचार सभा सुरू झाल्या नसल्या तरी बैठका आणि भेटीकाटीना वेग आला असून करवीर तालुक्यात झालेल्या विविध ठिकाणच्या बैठकीत अमल महाडिक यांनी सभासद हिताच्या पायावर उभारलेली राजारामची पवित्र वास्तू विरोधकांच्या हाती जाऊ देऊ नका अशी भावनिक साद महाडिक घातली.महाडिक म्हणाले, आजतागायत जात-पात, गट-तट, पक्ष असा कोणताही भेदभाव न करता सभासद शेतकरी केंद्रबिंदू मानून आम्ही पारदर्शी कारभार केला. शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आज कारखान्याच्या कामगारांचे पगार वेळेवर होतात. कारखान्याला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांची बिले वेळेवर जमा होतात. असे असताना विरोधक केवळ सुडाच्या राजकारणातून बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन अमल महाडिक यांनी केले.यावेळी विलास बेडगे, महादेव पाटील, तानाजी पाटील, रमेश पाटील, शिवाजी पाटील, सुनील पाटील, कृष्णात धोत्रे, विलास पोवार, संजय जाधव, शिवाजी यादव, संभाजी देसाई, ज्ञानदेव देसाई, मधुकर देसाई, बाबुराव पाटील, शिवाजी सुतार, शिवाजी तेली, तानाजी एकले, शहाजी चौगुले, कृष्णात डोंगळे आदींसह सभासद शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.