डी.वाय.च्या शिल्लक सभासदांमध्ये निम्म्याहून अधिक बोगस – डॉ. मारूती किडगावकर यांचा आरोप

कोल्हापूर, दि. ९ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) डी.वाय.पाटील साखर कारखान्यामधल्या शिल्लक राहिलेल्या २२१३ सभासदातील निम्म्याहून अधिक नावे बोगस असल्याचा खळबळ जनक आरोप राजाराम कारखान्याचे संचालक डॉ. मारूती किडगावकर यांनी केला. राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित आळवे गावातील सभासदांच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते. राजाराम कारखान्याच्या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या आणि वारंवार राजारामच्या सभासदांना बोगस म्हणणाऱ्या सतेज पाटील यांच्या स्वतःच्या डीवाय कारखान्यातील बरेचसे सभासद बोगस आहेत असा आरोप करताना ते म्हणाले, डिवाय कारखान्याचे अनेक सभासद कारखाना कार्यक्षेत्रातील मांडुकली गावचे रहिवासी दाखवले आहेत, पण प्रत्यक्षात ते कसबा बावड्याचे रहिवासी आहे. मूळ कार्यक्षेत्रातील सभासद कमी करून असे आणखी किती सभासद यांनी बोगस लावले आहेत? हे त्यानी जाहीर करावे असे आव्हान डॉ. किडगावकर यांनी दिले. अमल महाडिक यांनी, सर्वोच्च न्यायालयात जाऊन आम्ही सभासदांचे हक्क आणि अधिकार अबाधित राखले याचाच विरोधकांना पोटशूळ असल्याचं सांगितलं. काहीही झालं तरी राजाराम कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहील याचा पुनरुच्चार त्यांनी केला. यावेळी प्रशांत तेलवेकर, किरण जाधव, जयसिंग पाटील ,सुभाष पाटील सर, संतोष पाटील, वाय.के.पाटील, बाळासाहेब पाटील, शिवाजी बंगे, तानाजी पाटील, सूर्यकांत पाटील, शिवाजीराव गायकवाड, आनंदराव चौगले, शिवाजी पाटील (मेजर), शिवाजी यादव, जनार्दन पाटील, युवराज गायकवाड, मधुकर पाटील, पांडुरंग खामकर यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.